मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ‘जिओ नेटवर्क’ने अत्यंत स्वस्त दरात मोबाईल डेटा उपलब्ध करून दिल्यामुळे देशातील मासिक डेटावापर २० कोटी जीबीवरून तब्बल ३७० कोटी जीबीवर पोहोचला आहे. एकट्या जिओचे ग्राहक त्यामधील २४० कोटी जीबी डेटाचा वापर करत आहेत. मोबाइल डेटा वापराबाबत भारत १५५ व्या स्थानावावरून पहिल्या क्रमांकावर आला आहे. जिओच्या या क्षेत्रातील प्रवेशाला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली. या कालावधीत डेटावापर केवळ वाढलेला नाही, तर जिओच्या आक्रमक धोरणांमुळे आघाडीच्या कंपन्यांमध्ये नवे दरयुद्ध सुरू झाल्याचे दिसत आहे. याचा थेट लाभ ग्राहकांना मिळत आहे.
अवघ्या दोन वर्षात जिओने मोबाईल सेवा पुरवठा क्षेत्राचे चित्र बदलून टाकले आहे. सेवेच्या सुरुवातीच्या काही महिन्यातच जिओ जगातील पहिले आणि एकमेव एक्साबाइट टेलीकॉम नेटवर्क बनले. ज्यामध्ये जिओ नेटवर्कवरून डेटाची वाहतूक प्रत्येक महिन्याला शंभर कोटी जीबीपेक्षा अधिक झाली. जिओचे फ्री व्हॉइस कॉलिंग हे वैशिष्ट्य ग्राहकांसाठी आकर्षणाचा विषय ठरले. त्यामुळे केवळ दोन वर्षांच्या कालावधीत जिओने २१ कोटी ५० लाख ग्राहकांचा टप्पा गाठला आहे. महसुलाच्या बाबतीत जिओने दुसऱ्या क्रमांकावर उडी घेतली आहे. व्होडाफोनला मागे सारत जिओने २२.४ महसुली हिश्श्यासह दुसरे स्थान मिळवले आहे.
जिओचे नेटवर्क अत्याधुनिक, ऑल आईपी नेटवर्क आहे, ज्यात आठशे मेगाहर्ट्ज, अठराशे मेगाहर्ट्ज आणि २३०० मेगाहर्ट्ज बँडवर एलटीई स्पेक्ट्रम आहे. जिओ नेटवर्क लवकरच भारताच्या ९९ टक्के लोकसंख्येपर्यंत पोहोचणार आहे. जिओने केवळ १७० दिवसात १० कोटी ग्राहकांचा टप्पा पूर्ण केला. म्हणजेच दर सेकंदाला सात ग्राहक जिओने जोडले.२१ कोटींहून अधिक ग्राहक डिजिटल लाइफचा आनंद घेत आहेत. जिओच्या प्रवेशानंतर फेसबुक, यूट्यूब आणि इतर प्रमुख समाजमाध्यमांचा वापर वाढला आहे. त्यामुळे भारत गूगल आणि फेसबुकसाठी सगळ्यात सक्रिय अशी बाजारपेठ ठरली आहे.